मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक उपोषण केले तसेच ते सतत लढा देत आहे. दरम्यान, राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणवीर असताना मनोज जरांगे हे एकटे पडले आहेत.
कारण मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता नव्याने ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची ताकद एकवटली त्यातून सरकारवर दबावही निर्माण झाला. मात्र त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे नेमके हाती काय लागले? हा सवाल मराठ्यांना पडत आहे. त्यामुळे ज्या संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चा सारखे आंदोलन उभे करून मराठी मनात हुंकार आणि स्फूर्ती भरली.
त्या संघटना आता पुन्हा एकवटल्या आहेत. शिवसंग्राम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक घेऊन पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार 10 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.
जरांगे पाटील यांना सोडून इतर संघटना एकवटल्याने मराठा समाजात फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र जरांगे आणि आमच्या मागण्या वेगळ्या असून आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी लढणार असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलंय. आजच्या बैठकीत आरक्षण,सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यासह दहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी परभणीत मोठी महापरिषद घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन मराठा समाजाला काय देणार याचे उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान ,एकूणच पाहायला गेले तर जरांगे पाटील यांना बाजूला ठेऊन मराठा समाज आता आंदोलनात उतरताना दिसत आहे.