सध्या राज्यात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार आहे अशा चर्चाना उधाण आले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आता लक्ष्मण हाके यांनी एका मुद्द्यावर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी कुठे आहे? मी राष्ट्रवादी वेगळी मनात नाही. पवार कुटुंबीय कधीच वेगळे नव्हते. अजितदादांचा पहाटेचा शपथविधी असो की आता जाऊन भाजपला मिळणं असो. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचे काम आजपर्यंत केलं आहे. पवार कुटुंबीयांनी आजपर्यंत एकही चळवळ लढवली नाही. पवार कुटुंब नेहमी सत्तेत राहाणारं आहे, त्यामुळे मला नाही वाटत ते फार काळ सत्तेच्या बाहेर राहू शकतील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलाताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष विशेषत: राष्ट्रवादी पक्ष शरद पवार हे सत्तेच्या बाहेर कधीच राहू शकत नाहीत, भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले, कारण ती जागा एकतर रोहित पवार किंवा जयंत पाटील यांना ठेवली होती, असं हाके यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी विरोधी पक्षात काम केलं पाहिजे. लोकनेता व्हायचं असेल तर जनसामान्य लोकांची कामं केली पाहिजेत, असा सल्लाही यावेळी हाके यांनी दिला आहे.
दरम्यान, सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर देखील हाके यांनी प्रक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि राज्यातील विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती त्यांनी भरून काढावी, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.