पाच जणांच्या मृत्यूने फरीदाबाद हादरलेय. पोटच्या चार लेकारांसह बापाने धावत्या ट्रेनसमोर उडी घेतल्याची धक्कादायक घटना दिल्ली एनसीआरमधील फरीदाबादमध्ये घडली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि फरीदाबादमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आले आहे. पत्नीसोबतच्या वादानंतर नवऱ्याने चार मुलांसोबत ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली.
पत्नीशी वाद झाल्यानंतर ४५ वर्षीय मनोज महतो याने चार अल्पवयीन मुलांसह धावत्या रेल्वेसमोर रुळावर उडी घेतली. या घटनेत पिता आणि त्याच्या चार मुलांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (10 जून 2025) दुपारी 12:55 वाजता दिल्ली-एनसीआरमधील फरीदाबाद येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज महतो याचा पत्नी प्रियाशी सतत वाद होत होता. मंगळवारी सकाळीही त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर मनोजने मुलांना गार्डनमध्ये घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला अन् टोकाचे पाऊल उचलले.
मनोज हा मूळचा बिहारमधील असून तो आपल्या चार मुलांना – पवन (10), करु (9), मुरली (5) आणि छोटू (3) – घेऊन रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर चालत होता. यावेळी त्याने दोन मुलांना खांद्यावर घेतले होते, तर दोन मुलांचे हात धरले होते. ट्रेन जवळ आल्यानंतर मुलांसोबत रूळावर उडी घेतली.
लोको पायलटने अनेकदा हॉर्न वाजवला, पण मनोज रुळाजवळून बाजूला झाला नाही. ट्रेन जवळ येताच त्याने मुलांसह रुळावर उडी घेतली, ज्यामुळे सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह रुळावरून बाजूले केले अन् पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तपासादरम्यान पत्नीसोबतचा वादामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.