नाशिकच्या कळवण मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथे सुरु असलेल्या आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडालीय. दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झालेत. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

नेमकं प्रकरण काय ?
कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होतं. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि आंदोलकामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून दगडफेक झाल्याचे बोललं जात आहे. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.