मनोज जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य... आंदोलानबाबत काय म्हणाले CM फडणवीस ?
मनोज जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य... आंदोलानबाबत काय म्हणाले CM फडणवीस ?
img
Nandini khandare More
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली असताना, त्यांच्या १३ पैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. कायदेशीरदृष्ट्या शक्य असलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, एका मागणीबाबत न्यायालयीन प्रकरण आणि कायदेशीर अडचणी असल्याचे जरांगे यांना समजावून सांगण्यात आले आहे. 

त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना त्रास होईल किंवा उत्सवात विघ्न निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून निघाले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेला अर्ज पोलिसांनी नाकारला आहे. त्यांच्याकडून पुन्हा अर्ज करण्यात आला असल्यास त्यावर गुणवत्तेनुसार पोलीस निर्णय घेतील. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असून, यापूर्वीही आंदोलने झाली आहेत आणि पुढेही होऊ शकतात. मात्र, सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जरांगे यांनी यापूर्वी केलेल्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य झाल्या आहेत. जी मागणी मान्य करता येत नाही, त्याबाबत कायदेशीर अडचणी, न्यायालयातील प्रकरण आणि महाधिवक्त्यांचे मत याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचा मराठा समाजालाच कसा फटका बसू शकतो, हेही समजावून सांगण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य शासनाच्या २५ प्रमुख योजना आणि २५ धोरणांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई (आयआयएम मुंबई) यांच्या सहकार्याने ही व्यवस्था उभी करण्यात आली आहे. या योजनांचा उद्देश साध्य होत आहे का, त्या संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत का, लाभ मिळण्यासाठी किती वेळ लागतो, प्रक्रियेत काही अडथळे आहेत का, याचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात येणार आहे. विविध औद्योगिक धोरणांचा संबंधित घटकांना अपेक्षित लाभ मिळत आहे का आणि त्यात काही अडचणी आहेत का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group