राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये, हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारने काढलेल्या जीआरमधील अनिवार्य शब्द काढण्यात आला असला तरी हिंदी भाषा कशी गरजेची आहे? हे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
हिंदी सक्ती विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत. आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले अशोक उईके?
आदिवासी मंत्री आणि भाजप नेते अशोक उईके यांनी हिंदी बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार, हिंदीत बोलणार नाही. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अनपड आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत. मी तेच बोलणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान एकीकडे मुंबईमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे भाजपच्याच मंत्र्यांनी मराठीत बोलणार, हिंदीत बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मराठी बोलण्यावरच ठाम मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.