राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारील मतमोजणी म्हणजे निकाल आहे. पण या महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. मतदान होण्यापूर्वीच भाजप-शिवसेना युतीने दमदार ओपनिंग केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात भाजप-शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान होण्याआधीच भाजप-शिवसेनेचे ६६ उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन ठिकाणी जिंकले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर ६६ ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालं.