गेल्या काही काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. निवडणुकांपूर्वी तर पक्षांतर होत होतेच पण निवडणुकानंतरही पक्षांतरांना ब्रेक लागलेला नाही. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
अविनाश वारजूकर यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतिश वारजूकर, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. माहितीनुसार, अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू सतीश वारजूरकर यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होते. याबाबतचे एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे पाठवले होते. या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रात काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले होते.
पक्षात अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली असून, यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काँग्रेस पक्षाचा वापर काही लोकांकडून स्वतःच्या धंद्यासाठी केला जात आहे, वारंवार तक्रारी करूनही पक्षश्रेष्ठींकडून या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुळे आम्ही राजीनामा देत आहोत असं या दोघांनी म्हटले होते. दरम्यान या पक्षप्रवेशाने भाजपाची चंद्रपूरमध्ये ताकत वाढली आहे.