नाशिक - दसरा व दिवाळी सुरू होण्याच्या आधीच नाशिकमध्ये बनावट दुग्धजन्य पदार्थांचा साठा येण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती चौकामध्ये एका पेढीवर छापा टाकून 43 हजार रुपयांचा बनावट खवा आणि पनीर नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दि.ज्ञा. तांबोळी यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सिडको त्रिमूर्ती चौक येथील मे. विराज एंटरप्रायजेस या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विभागाने या पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा १२९ किलो ग्रॅम किंमत रु. ३८ हजार ,७०० रुपये व खवा १८ किलो ग्रॅम किंमत रु. ५ हजार ०४० रुपये असा एकूण एकूण किंमत रु. ४३ हजार ,७४० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर व खवा या दोन अन्न पदार्थाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात आला आहे.
तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व ते परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला. पनीर व खवा या अन्न पदार्थाचे नमुना विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल आज प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. हि कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, उमेश सूर्यवंशी , अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा गुप्तवार्ता यांनी मनिष सानप, सहायक आयुक्त, (अन्न) . दिनेश तांबोळी, सह आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक व विक्रेते, यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही, अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत. अशी माहिती सांगून सह आयुक्त दि.ज्ञा. तांबोळी यांनी सांगितले की, अन्न व्यवसायिकांना कळविण्यात येते की, त्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे पालन करावे. तसेच प्रशासनातर्फे सर्व जनतेस व भाविकांना अवाहन करण्यात येते की, सण-उत्सव काळात पनीर, पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थासंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन तांबोळी यांनी केले आहे.