आई वडील प्रसंगी स्वतः उपाशी राहतात पण मुलांना काही कमी पडू नये यासाठी प्रयत्न करत असतात. पण बऱ्याचदा हीच पोटची लेकरं वैरी ठरतात अन आईवडिलांचाच घात करतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना रायगड येथे घडली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं आहे.
कौटुंबिक वादातून दोन मुलांनीच स्वतःच्या वृद्ध आई वडिलांची हत्या केली आहे. आईवडील घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आईवडिलांचा काटा काढल्याचा प्रकार समोर आलाय.मृतांची नावे महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी असून, दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते.
सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू की आत्महत्या, याबद्दल संशय होता. मात्र म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या तपासात या मृत्यूमागे खुनाचा सुगावा लागला. पोलिसांनी तपासाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री दोन्ही मुलांनी घरात प्रवेश करून आईवडिलांवर हल्ला चढवला. दोघांना ठार मारल्यानंतर त्यांनी मृतदेह घरातच ठेवून पळ काढला. दोन दिवसांनंतर शेजाऱ्यांना कुजलेल्या वासाने संशय आला आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर या घटनेचा भयानक उलगडा झाला.
या प्रकरणात पोलिसांनी महादेव कांबळे यांचे दोन मुलगे नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.