तीनच दिवसांत शिंदे गटाला पुन्हा धक्का बसलाय. करमाळयात तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आता इगतपुरीतही शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
पक्ष नेतृत्वाने निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला, तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ऐनवेळी पक्ष प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजीतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या इच्छुकांना तिकीट न देता बाहेरून आलेल्यांना प्राधान्य देणे, तसेच काही वरिष्ठ नेत्यांनी स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोपही शहरातील पदाधिकाऱ्यांनी केला. “आम्ही दोन वर्षांपासून पक्ष उभारत आहोत, मात्र आमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून आमच्या मतांची तमा न बाळगता निर्णय घेतले गेले, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. नव्या पक्षात सामील झालेल्या इच्छुकांना उमेदवारी देखील देण्यात आल्याची माहिती मिळते. यापूर्वी बागल गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला राजीनामा दिला होता.
बागल गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळालं. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी सामूहिक राजीनामा दिला. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे.