जुन महिन्याची १५ तारीख उलटून गेली तरीही अद्यापही मान्सून ने हजेरी लावली नसल्याने हि चिंतेची बाब निर्माण झाली आहे. याचदरम्यान आता नाशिककरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी कठोर पाऊल उचलले आहे. जून आणि जुलै २०२६ महिन्यात शहरातील प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांतून दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी प्रक्रिया करून विविध जलकुंभ आणि जलवाहिन्यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.
महापालिकेच्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ ते १४ जून २०२६ या कालावधीत आरक्षित पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रमाणावर वापर झाला असून सध्या केवळ १२६६.०१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हा साठा सध्याच्या वापरानुसार सुमारे ६० दिवस पुरेल, तर ऑगस्टअखेरपर्यंतचा कालावधी पाहता अजून ७८ दिवसांचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे सुमारे १८ दिवसांच्या संभाव्य पाणीटंचाईची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर जूनमधील उर्वरित शनिवार आणि जुलैमधील सर्व शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यातही पाणी बचतीसाठी १, ४, ७, १०, १३, १६, १९, २२, २५, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी वाया जाऊ देऊ नये आणि महापालिकेच्या या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.