नागपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात आमचं मतदान कमी झालेलं नाही. परंतु भाजपचं मतदान वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींच्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मतदारांची नवीन आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. निवडणूक आयोगाने किती मतदार वाढले आणि कुठे हे सांगितलंय. दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार आहे.
त्यामुळे कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून केला जात आहे. ते आत्मचिंतन करणार नाहीत, खोट्या मनाची समजूत करून घेतील. तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही'.
'राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. आठ तारखेला येणाऱ्या दिल्लीचा निकाल आल्यावर त्यांच्या पक्षाचं नाव संपणार आहे. त्यामुळे राहुल गांधी त्यादिवशी काय बोलणार म्हणून त्याचा सराव आतापासून करत आहेत. राहुल गांधी यांनी आता आत्मचिंतन करावं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी यांनी काय आरोप केला?
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटलं की, महाराष्ट्रात मागील ५ वर्षांत ३२ लाख मतदारांना जोडले गेले. पण २०२४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार कसे जोडले? विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक इतके मतदार कुठून आले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.