राजस्थानमधील जयपूरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे. लग्न समारंभानंतर वधू-वर त्यांच्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह मध्यप्रदेश येथून परतत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ (दौसा-मनोहरपूर महामार्ग) येथे त्यांची कार समोरुन येणाऱ्या कंटेनरला धडकली. कंटेनर इतक्या वेगाने कारवर आदळला, की कारचा चक्काचूर झाला.
कारला कंटेनरला धडक मारल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच रायसर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली. कारमध्ये एकूण १४-१५ लोक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
नुकतंच लग्न झालेल्या नवविवाहित दांपत्य त्यांच्या कुटुंबियांसह, नातेवाईकांसह मध्यप्रदेशहून राजस्थानला कारमधून येत होते. तेव्हा त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने जोरात टक्कर मारली.
या अपघातात वधू-वरांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमी व्यक्तीने उपचारादरम्यान निम्स रुग्णालयात जीव गमावला, अशी माहिती समोर आली आहे.