मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , अपघाताची भीषण दुर्घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता नोहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिमरी गावात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. बांदकपूर येथून देवदर्शन करून जबलपूरला परतताना अपघाताची घटना घडली आहे.
मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनवार चौकी महादेव घाट पुलाजवळ एक कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. या कारमध्ये एक डझनहून अधिक प्रवासी होते. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जबलपूरच्या भीटा फुलर गावातील संपूर्ण कुटुंब होतं.
संपूर्ण कुटुंब बांदकपूरच्या जटाशंकर धाम येथून दर्शन करून जबलपूरला परतत होतं. पूल ओलांडताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यातील ६ लोकांनी जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांनी दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला.
भीषण अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं.
मृतांची ओळख पटली
मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील सिमरी गावात झालेल्या अपघातातील जखमींची ओळख पटली आहे. रज्जो सिंह(५५), अंकीत, वैभव सिंह (१२), आयुष , रविंद्र (२२) असे अपघातात जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. तर लौग बाई, हल्की बाई, संपत बाई, गुड्डी बाई, बैजंती बाई, रचना, तमन्ना आणि शिब्बू हे अपघात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत.