एका सभेमध्ये अजित पवारांनी दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक उद्गागार काढले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हणत सारवा सारव केली. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना या वक्तव्यावरून टोला लागवला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ध चा मा करायला काय आनंदीबाईंचं राज्य आहे का? तसेच अजित पवारांबद्दल चुकीचं दाखवायला कुणाची हिंमत आहे. अजित पवार काय बोलले ते सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी या देशाचे मोठे उद्योगपती होते. देशातील उद्योग क्षेत्राला उर्जित अवस्था देण्याचं काम त्यांनी केलं. रिलायन्सच्या साम्राज्याचे ते संस्थापक आहेत. अजित पवारांनी त्यांना चोर म्हटलं. पण त्यांच्या मागे कधीही ईडी लागली नाही. तसेच त्यांच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं. मात्र आता जे साखर कारखानदार भाजपसोबत गेलेले आहेत. त्यात जरांडेश्वर वैगेरे आहेत. त्यांच्या वर ईडी आणि इन्कम टॅक्सच्या जप्त्या आल्या होत्या. त्यामुळे व्यवसाय आणि राजकारणात चोऱ्या-माऱ्या आणि लांड्या-लबाड्या कोण करत आहे? हे लोकांना माहिती आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना त्यांच्या धीरूभाई अंबानींवरील विधानावरून टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
या सभेमध्ये बोलतानना अजित पवार हे तरूणांना रोजगार नोकरी याबाबत मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, तरूणांनी कोणतही काम करताना त्या कामाची लाज बाळगू नये. पेट्रोल पंपावर काम करून देखील मोठी ध्येय साध्य करता येतात. जसे पेट्रोल पंपावर काम करूनच धीरूभाई अंबानी हे मोठे उद्योजक झाले. मात्र अजित पवार म्हणाले की, मला सहकार टीकवायचा नसता तर मी पेट्रोल पंप काढली नसती. त्या पंपावर गोरगरिबांची मुलं कामं करतात. कारण पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणे देखील कमीपणाचं नाही. पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्यातून सोन निर्माण करता आलं पाहिजे.