सध्या मुंबईत कबुतर खान्यावरून चांगलाच वाद पेटताना दिसत आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेकडून दादर येथील कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, कबूतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोक कबूतरांना धान्य टाकत असल्याचे लक्षात आले. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर सक्त कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर महापालिकेकडून दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली.
यानंतर आता जैन समाज आक्रमक झाला. आधी त्यांनी म्हटले की, आम्ही कबूतरखान्याजवळ प्रार्थना सभा घेणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर सांगण्यात आले की, आंदोलन रद्द करण्यात आलंय. मात्र, आज सकाळी जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी एकच हल्लाबोल केला. यावेळी पोलिसांसोबत त्यांनी बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी कबूतरखान्यावरील ताडपत्रीदेखील फाडली.
यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त देखील तिथे पोहोचला आहे. मात्र, या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे बघायला मिळतंय. अगोदरपासूनच या भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या दादरमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे बघायला मिळतंय.