सध्या देशातील महागाईची स्तिथी पाहता अनेक तर्क वितर्क राजकारणात लावले जात आहेत. वाढत्या महागाईचा फटका बघता विरोधकांनी देखील प्रत्यारोपाची झोड सुरु केली आहे. आता एका नेत्याने एक मोठं आणि खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशावर स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट येणार आहे,” असा इशारा देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हे संकट येणार हे आम्ही आधीपासून सांगत होतो. पण सरकार गंभीर नाही. त्यांना माहिती आहे की शेवटी धार्मिक मुद्द्यांवर वातावरण तयार करून अपयश झाकायचं आहे.” त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करत, “त्यावेळी त्यांनी देशाला मोठ्या आर्थिक झळांपासून वाचवलं होतं,” असं म्हटलं.
आव्हाड यांनी वाढत्या महागाईवरूनही सरकारला लक्ष्य केलं. “देशात महागाईचा भडका उडालेला आहे, पण सरकारकडे कोणताही ठोस उपाय दिसत नाही. काळाबाजार करणारे उघडपणे सक्रिय आहेत, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “हे सरकार सामान्य जनतेसाठी नसून भांडवलदारांसाठी काम करत आहे. सरकारला अपयश झाकण्यासाठी शेवटी हिंदू-मुस्लीम आणि धर्माच्या मुद्द्यांकडेच वळायचं आहे,” असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला.