मुंबई : मालाड-पश्चिम येथे मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) सकाळी बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत आठ जण होरपळून गेल्याची घटना घडली. यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका ८ मजली इमारतीला मंगळवारी (ता.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच इमारतीतील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. मात्र, धुराचे लोळ उठल्याने लहान मुलांसह १४ जणांचा दम घुसमटला. यातील ३ जणांची शुद्ध हरपल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दम घुसमटल्याने १४ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबईतील मालाड परिसरात आठ मजली गिरनार गॅलेक्सी निवासी इमारत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या मीटर कॅबिनमध्ये अचानक विजेच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे मीटर कॅबिनला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण इमारतीला विळखा घातला.
आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने जवळपास १४ जणांचा दम घुसमटला. काहींची तर शुद्ध देखील हरपली.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान इमारतीतील रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.