दैनिक भ्रमर : देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी भीषण रस्ता अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असून, तीर्थयात्रेसाठी निघाले होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तसेच पोलिसांनी तात्काळ बचावकार्याला सुरूवात केली.
हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली.