मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव पाठवल्यापासून हे दोघे जण पुन्हा एकत्र येणार असल्याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपले मत मांडत आहेत. अशामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येतील. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.', असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. मेळाव्याच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती बाबतच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 'ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते एकत्र आले तर हा वारसा अधिक समर्थपणे पुढे जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी ते एकत्र येतील आणि महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.', असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.