वातावरणात होणारे कमालीचे बदल पाहता आता पुन्हा एकदा राज्यातील 21 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह राज्यात पुढील 24 तासांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. हवामानात अनपेक्षित बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजी नगर येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिकमध्येही आकाश अंशतः ढगाळ राहील. वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता आहे. तेथील किमान तापमान 22 अंश सेल्सिअस कमाल 34 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.विदर्भातील नागपूरमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक असून कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र दुपारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.