गेल्या दशकभरात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मूळ पक्षांमधून भाजपामध्ये प्रवेश केला. यादरम्यान बाहेरून आलेल्या नेत्यांशी सूर जुळत नसल्याने भाजपातील काही दिग्गजांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ईशान्य भारतातील भाजपाचा गड समजला जाणाऱ्या आसाममध्ये नुकतीच याची प्रचिती आली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ भाजपात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याने गुरुवारी पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

नागांव लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजेन गोहेन यांनी गुवाहाटी येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला राजीनामा सुपूर्त केला. माजी केंद्रीय मंत्री आणि चार वेळा भाजपकडून खासदारपद भूषवलेले राजेन गोहेन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर गोहेन यांच्यासह इतर १७ सदस्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यांनीही राजीनामा देत राजेन गोहेन यांना पाठिंबा दर्शवला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेन गोहेन हे आसाममधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. राजीनामा देणारे बहुतेक सदस्य आसामचे आहेत. 'आसामच्या लोकांना दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत आणि स्थानिक नागरिकांचा विश्वासघात केला. बाहेरच्या लोकांना आसाममध्ये स्थायिक होऊ दिले' असे कारण सांगत गोहेन यांनी राजीनामा दिला.
राजेन गोहेन हे १९९९ ते २०१९ पर्यंत नागाव संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१६ ते २०१९ पर्यंत रेल्वे मंत्रालयात ते राज्यमंत्री देखील होते. भाजपमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ते चहाच्या व्यवसायामध्येही सक्रीय आहेत, आसाममधील त्यांच्या मालकीच्या चहाच्या बागाही आहेत. अन्य क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.