गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. आज पुन्हा राहुल गांधी यांनी मतचोरीप्रकरणी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आज याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी तीव्र शब्दात निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी मतचोरीचे पुरावे देखील सादर केले.
राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मतचोरीच्या मुद्द्यावरून मी जे काही बोलत आहे ते मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मतदार यादीतून अनेक लोकांची नावं वगळण्यात आली आहेत. कर्नाटकमधील उदाहरण देत त्यांनी गंभीर आरोप केले. दलीत, आदिवासी आणि ओबीसी यांची नावे वगळली जात आहेत. कर्नाटकमधील आनंद मतदारसंघात ६०१८ मते वगळली. काँग्रेसच्या मतदारांना वगळले जात आहे.', असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आयुक्तांच्या विरोधात माझ्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. मी देशावर अन् संविधानावर प्रेम करतो. पण सध्या देशात मतांना हायजॅक केले जातेय. टार्गेट करून काँग्रेसच्या मतांना कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय.', असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, 'कर्नाटकमध्ये बाहेरून मत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १४ मिनिटांत १२ मते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले. ३६ सेकंदात फॉर्म भरला अन् जमा केला गेला. कर्नाटकमध्ये जे झाले ते महाराष्ट्र, हरियाणा अन् उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात झाले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने जागा जिंकल्या त्या ठिकाणाची मते हटवण्यात आली. आयोगाकडून सीआयडीला कोणताही माहिती दिलेली नाही.