रक्षकच जर असुक्षित राहिले , मानसिक तणावात राहिले तर होणारे नुकसान भरून न निघण्यासारखे आहे , बरं त्यातही जर हा मानसिक तणाव पोलीस स्टेशनमध्येच मिळत असेल, वरिष्ठांकडून मिळत असेल तर त्या पोलीस कर्मचाऱ्याने कोणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्नच मग निर्माण होतो. पुण्यातील वाढती गुन्हेगारी कोणापासून लपून नाही आता ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी ज्या पोलिसांवर सर्वात मोठी जबाबदारी असते ते पोलीस कर्मचारीच मानसिक तणावात असल्याचे एका घटनेनं समोर आले आहे.
पुण्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल रणदिवे हे ५ डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील अंतर्गत वाद आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पिळवणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट
निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, नारायण देशमुख हे निखिल रणदिवे यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. तसेच मुलीच्या आजारपणात आणि तिच्या पहिल्या वाढदिवसाला सुट्टी मागितली असता, ती नाकारण्यात आल्याने रणदिवे प्रचंड मानसिक तणावात होते. मानसिक छळ आणि गेल्या वर्षभरापासून हुकूमशाही पद्धतीने वागणूक मिळत असून, सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. निखिल रणदिवे यांच्या पोस्टमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हेदेखील नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
निखिल रणदिवेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली सुसाईड नोट
निखिल रणदिवे यांनी 4 डिसेंबरला वरिष्ठ अधिकारी बापूराव दडस यांना एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून आपल्याला त्रास आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून म आत्महत्या करत असल्याचेही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
निखिल रणदिवे यांच्या मुलीचा ५ डिसेंबरला वाढदिवस होता. त्यांनी मुलीच्या वाढदिवसासाठी रजेचा अर्ज केला होता. मात्र, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी रजा देण्यास नकार दिला. त्यानंतर निखिल रणदिवे यांनी व्हॉटसअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. यामध्ये त्यांच्या मुलीचा फोटो होता. यात तिन्ही लिहिले की "बाळा आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस खात्यात नोकरीला आहे, जिथे वरिष्ठांची मनमानी चालते... दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", असे निखिल रणदिवे यांनी या स्टेटसमध्ये म्हटले होते. या मेसेजनंतर काही वेळातच त्यांनी स्वतःचा फोटो 'भावपूर्ण श्रद्धांजली'च्या फ्रेममध्ये पोस्ट केला आणि आपला मोबाईल स्विच ऑफ केला. तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
रणदिवे यांचे भाऊ अक्षय रणदिवे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अद्याप यवत पोलीस ठाणे किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रा केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा, अशी मागणी निखिल रणदिवे यांच्या पत्नीने केली आहे.