मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट! माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न.....
मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट! माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न.....
img
दैनिक भ्रमर
जालना : मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. अशात आता मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.  सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.  

मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 

नक्की काय घडलं? 
दरम्यान याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, 'आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही. आमच्यासोबत 7 वेळ अशा घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच जाहीर सांगत नाही. साल्हेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही सरंक्षणाची मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही. आम्ही साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. सर्व गाड्या खाली लावण्यात येतात. मात्र, वरती अचानक कुठूनतरी एक पिकअप तिथे आले. मला त्यावेळी ते लक्षात आले नाही. पण दर्शन करत असतांना पोलीस लवकर चला म्हणून गरबड करत असल्याने मला शंका आली. 

त्यामुळे खाली काहीतरी घडलं असल्याचे मला जाणवले. पण पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत मला कळूच दिले नाही. पण, पिकअप सारखी एक गाडीचे ब्रेक खराब झाले म्हणून जोरात वरून खाली आली. प्रचंड वेगाने आलेली ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूल पडले. पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाला पकडले असता, त्याने कोणाचतरी नाव घेऊन मला पिकअप घालण्याचे सांगण्यात आल्याचं म्हटले. हा सर्व प्रकार खरं आहे की खोटा आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीकडे केली असल्याचे जरांगे म्हणाले. 



 
इतर बातम्या
Join Whatsapp Group