पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहील, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी हे सडेतोड उत्तर दिलं.
ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही, असं पंतप्रधान काल म्हणाले होते. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काही म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहात. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाला. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं शरद पवार यांनी ठासून सांगितलं.