विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका असून पराभूत कोण होणार? याचा अंदाज आता बांधला जात आहे. दरम्यान, आज सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवन परिसरात मतदान होणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी होणार आहे.

आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. “विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार”, असं सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
“विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार वैगेरे काही होणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे आमचे सर्वांचे आमदार एकत्र आहेत. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार १०० टक्के वियजी होतील. राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार, कारण त्यांच्याकडून (विरोधकांकडून) होऊ शकत नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.