राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला. दोन आठवड्यापूर्वीच अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता. त्यादरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या होत्या. त्याची काही प्रमाणात पूर्तता झाली आहे का? अधिकारी तत्परतेने काम करत आहेत का? यासाठी आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी हिंजवडीचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलंच सुनावलं.
जांभुळकर हे मंदिर न पाडण्यासाठी आग्रह करत होते. “धरण बांधताना मंदिर जातातच, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचं ते करतो. आपलं वाटोळ झालं. हिंजवडीचं सगळं आयटी पार्क पुण्यातून बाहेर जात आहे. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला इथं सकाळी सहाला आलो आहे. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.” असं म्हणत अजित पवारांनी जांभुळकर यांना खडसावलं. हिंजवडी मेट्रोच्या कामाची पाहणी दरम्यान अजित पवारांनी अधिकाऱ्यांचीदेखील शाळा घेतली.
काय म्हणाले अजित पवार ?
“आपलं असं ठरलय की कुणीही मध्ये आलं तरी 353 टाकायचं. कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 टाका. 353 लावल्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा आणि माझं ते करा सुरु राहिलं. ते आपल्याला होऊ द्यायच नाही. एकदाच संपूर्ण कामच करुन टाकायचय” असं अजित पवार म्हणाले.
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते. बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेली. तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची व्हय असं थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावलं आहे.