मुंबईतील घाटकोपर असल्फा परिसरामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना (गुरुवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ३ ते ४ जणांना उडवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे.
याबात अधिक माहिती अशी की, मुंबईच्या घाटकोपर असल्फा परिसरामध्ये भरधाव वेगात जात असलेली कार पुलाला धडकली त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलामध्ये कोसळली. पुढे चालत जात असणाऱ्या ३ ते ४ जणांना ही कार धडकली, त्यानंतर ती पुलाच्या कठड्यावर अडकली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार भरधाव वेगात होती, कारने पुढे चालत असणाऱ्यांना उडवलं त्यानंतर कार पुढे पुलाच्या कडेला अडकली आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून इथला पूल रखडला आहे. मुंबई महापालिकेनं तो धोकादायक देखील जाहीर केला आहे. मात्र त्यापुढे पालिकेनं कुठलीच कारवाई केलेली नाही. या पुलामुळे इथं वारंवार अपघात होतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे.