राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. आज ते बारामती दौऱ्यावर होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी ते बारामतीच्या दौऱ्यावर जात होते. दरम्यान, सकाळी लँडिंगवेळी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवारांसह एकूण ५ जणांचे दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच नेते मंडळी तसेच कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी ठरली. दरम्यान मोठा भाऊ हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की अजित पवार इतक्या लवकर आपल्यातून जातील. महाराष्ट्रासाठी दुःखद आणि दुर्दैवी घटना अजित पवार यांच्या जाण्याने झाली आहे. अजितदादा हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. प्रत्येक गोष्टीत त्यांना अत्यंत सखोल अभ्यास करून बोलण्याची त्यांची सवय होती. ते परखड, स्पष्टवक्ते होते. चूक असल्यास चूक असे निर्मळ मनाचे ते व्यक्तिमत्व होते. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केले आहे.
पुढे ते म्हणाले , लाडकी बहीण योजना अथवा इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी अथवा तरतूद अतिशय उत्तमपणे त्यांनी केली. मी त्याचा अनुभव घेतला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच. करतो, पाहतो असं शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हेत. जे जमत नाही ते त्याला नाही म्हणायचे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
माझ्यापेक्षा ते राजकारणात अनुभवी होते. वयानेही ते मोठे होते. त्यांना अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विभाग हातळले आहेत. राज्याला त्यांच्या या अनुभवाचा फायदा झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबियच नाही तर महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. आमची गेल्या अनेक वर्षांपासून जवळीक निर्माम झाली होती. एका मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या अपघाताची चौकशी व्हायला हवी का, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली. त्यावेळी आमचे जवळचे सहकारी या विमान अपघातात गेले आहे. या विमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. कारण अशा प्रकारचे अपघात होऊ नये याची काळजी, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही चौकशी केली जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.